भारतीय फुटबॉल संघाचे माजी डिफेंडर आणि मोहन बागान संघाचे कर्णधार राहिलेले मनितोम्बी सिंह यांचे रविवारी, 9 ऑगस्ट 2020 रोजी निधन झाले. ते ३९ वर्षांचे होते. मोहन बागान क्लबच्या सूत्रांनी सांगितले, की मणिपूरमधील इम्पाळजवळील आपल्या गावात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बरेच दिवस ते आजारी होते. त्यांच्यामागे पत्नी व आठ वर्षांचा मुलगा आहे.
वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी मनितोम्बी यांच्या निधनामुळे फुटबॉलविश्वाला मोठा धक्का बसला आहे. ते करोना होता किंवा नाही, याची पुष्टी होऊ शकलेली नाही. मात्र, ते अनेक दिवसांपासून आजारी होते.
मनितोम्बी यांच्या निधनानंतर मोहन बागान क्लबने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली- ‘‘माजी कर्णधार मनितोम्बी सिंह यांच्या निधनाने मोहन बागान परिवाराला तीव्र दु:ख झाले आहे.’’
मनितोम्बी यांनी भारतीय संघाकडून खेळताना उत्तम कामगिरी केली आहे. ते २००३ मध्ये २३ वर्षांखालील संघातही होते. त्या वेळी स्टीफन काँस्टेटाइन प्रशिक्षक होते.
हो चि मिन्ह शहरात झालेल्या सामन्यात भारतीय संघाने व्हिएतनामचा ३-२ असा पराभव करीत एलजी कप जिंकला होता. तब्बल दोन तपानंतर भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकता आली होती.
भारताने सिंगापूरमध्ये १९७१ मध्ये आठ देशांची स्पर्धा जिंकली होती. भारताचं हे पहिलं आंतरराष्ट्रीय विजेतेपद होतं. मनितोम्बी यांनी २००२ मध्ये बुसान आशियाई स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी २००३ मध्ये मोहन बागान क्लबबमध्ये पदार्पण केलं आणि २००४ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली क्लबने एअरलाइन्स गोल्डकप जिंकला होता.
२०१५-१६ मधील मणिपूर राज्यातील लीगमध्ये ते शेवटचे खेळले.
हेही वाचा….
माजी फुटबॉलपटू ई हमसाकोया यांचे करोनामुळे निधन