EnvironmentalGreen SoldierRaanwata

गौतम भटेवरा यांच्या घरातल्या कचऱ्याचं होतं सोनं…!

हिस्ट्री टीव्ही 18 वर ओएमजी यह मेरा इंडिया हा कार्यक्रम मी अनेकदा पाहिला आहे. देशातील  वेगवेगळ्या भागातील काही तरी हटके काम करणाऱ्यांची ओळख या कार्यक्रमातून होते. आपण या लोकांची थक्क करणारी कामगिरी पाहूनच तोंडात बोेटे घालतो. मात्र, नाशिकमध्येही अशी काही लोकं आहेत, की त्यांचं कर्तृत्व पाहून तुम्ही म्हणाल, ओएमजी यह है मेरा नाशिक. नाशिकमधील गौतम भटेवरा | Gautanm Bhatewara | असेच एक ओएमजी आहेत, ज्यांनी कचऱ्याचं अक्षरशः सोनं केलं..

गौतम भटेवरा
Mr. Gautam Bhatewara and Mrs. Pratibha Bhatewara

या माणसाचं पर्यावरणपूरक जीवनच अफलातून आहे. नाशिकची तिडके कॉलनी म्हणजे नाल्याच्या पलीकडली उच्च मध्यमवर्गीयांची संमिश्र वसाहत. या वसाहतीतून एक नाला गेला आहे. नाल्यात अर्थातच अनेक घरांचं सांडपाणी वाहत असेल, पण भटेवरांच्या सांडपाण्याने कधीच हा नाला पाहिलेला नाही. म्हणजे काय, तर त्यांचं सांडपाणी बाहेरच पडत नाही. तुम्ही म्हणाल, भटेवरांचा पाइप चोकअप झाला की काय… पण छे.. तसं अजिबात नाही. या माणसाने सांडपाण्याचा वापर इतका खुबीने केला आहे, की त्यावर त्यांची बाग फुलली आहे. बरं हे सांडपाण्यापुरतंच मर्यादित नाही, तर मलविसर्जनही त्यांनी बाहेर कुठेही काढलेलं नाही. त्यांचं मलविसर्जनाचं तंत्रही अजबच आहे. त्या मैलाचं उपयुक्त असं सोनखत तयार होतं. या माणसाचा कचराही कधी घंटागाडीत गेलेला कोणी पाहिला नाही. उलट शेजारपाजारचा कचरा ते गोळा करतात. भटेवरा नेमकं करतात तरी काय कचऱ्याचं…? तुम्हाला जाणून घ्यायचंय ना? मग हे वाचा, तुम्हीही म्हणाल, गौतम भटेवरा खरंच ओएमजी आहेत..

गौतम भटेवरा यांचा तिडके कॉलनीत चांगला ऐसपैस बंगला आहे. पण पक्का शेतकरी. त्यात भटेवरा दाम्पत्यावर सर्वोदयी विचारांचे संस्कार. 2003 पासून ते या विचारांशी जोडले गेले. त्यातूनच जीवन उत्सव चळवळ आकारास आली. या चळवळीचा पायाच मुळी सर्वोदयी विचारांनी भक्कम रचला गेला आहे. त्याचं काय आहे, की ही मंडळी खादीच्या वस्तूंची विक्री आणि प्रदर्शन, गांधीजींची पुस्तकं, त्यांच्याविषयीची व्याख्याने आदी अनेक उपक्रम राबवीत असतात. नंतर सर्वोदयी परिवार, मराठी विज्ञान परिषद, निर्मलग्राम निर्माण केंद्र आणि लोकाधार या चार संस्थांनी एकत्र येऊन 2009 मध्ये जीवन उत्सवची स्थापना केली. त्यातूनच पर्यावरणपूरक जीवनशैली | Ecofriendly Lifestyle |, तसेच विविध उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवणे हा या संस्थेचा मूळ गाभा. हा विचार मूळचा अजित टक्केंचा. त्यांनीच ही संकल्पना मांडली. सध्या जी काही चंगळवादी वृत्ती बोकाळत आहे, त्यामुळे जे काही पर्यावरणाचे नुकसान होत आहे, ते रोखण्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैली, तसेच इतर उपक्रम राबविण्याचा विचार पुढे आला. या सर्वोदयी विचारांच्या मंडळींनी पर्यावरण जीवनशैलीशी निगडित अन्न, वस्त्र, पाणी, ऊर्जा अशा जवळपास चौदा विषयांवर काम केलं आहे, नव्हे करीत आहेत. हे विषय घेऊन दरवर्षी अभय बंग, आनंद नाडकर्णी, अनिल अवचट आदींची व्याख्याने आयोजित करण्यात आली. काही परिसंवाद, कार्यशाळा घेतल्या. त्याच अनुषंगाने कचरा हा एक विषय होता. तोपर्यंत भटेवरांचा नाशिकशी तसा कनेक्ट नव्हता. 2005 मध्ये ते तिडके कॉलनीत राहायला आले. श्रीकांत नावरेकरांशी | Shrikant Navrekar | त्यांचा तसा परिचय होताच. ते सांडपाणी, तसेच कचरा या विषयावर निर्मलग्राम निर्मल केंद्रात लोकांना प्रशिक्षणही देतात. त्याने भटेवरा खूपच प्रभावित झाले. त्यांनी विचार केला, की हे जे काही आहे, ते आपण घरीच का नको करायला? त्या वेळी भटेवरांच्या घराचं काम सुरू होतं. नावरेकरांनी त्यांना सगळं मार्गदर्शन केलं. सुका आणि ओला कचरा बाहेर न जाऊ देता त्याचा घरातच कसा उपयोग करता येईल, यावर विचार केला. विशेष म्हणजे त्याची अंमलबजावणीही भटेवरांनी सुरू केली. आता चौदा वर्षे झाली, त्यांच्या घरातला 99 टक्के कचरा बाहेर जातच नाही. त्यांच्या या उपक्रमाची नोंद केंद्र सरकारच्या पुस्तकातही घेतली गेली होती.

शहरात राहूनही तुम्ही कचऱ्याचं नियोजन करू शकता हा विचार भटेवरांनी दिला आहे. प्लास्टिक तर ते कटाक्षाने टाळतात, पण काही अपरिहार्यता आहे, जेथे त्यांना प्लास्टिक टाळता येत नाही. मग त्या पॅकिंग वस्तू असेल किंवा अन्य मार्गाने असेल, असे प्लास्टिकच कचराकुंडीत किंवा घंटागाडीत जातं. त्यांच्या पत्नी प्रतिभा यांचीही गौतम भटेवरांना उत्तम साथ लाभली आहे. त्यामुळे प्लास्टिक | Plastic | येणार नाही, याची काळजी त्याही घेतातच. मात्र जे रोखता आलं नाही, ते प्लास्टिक ते रोपं तयार करण्यासाठी वापरतात. भटेवरांची चांदवडपासून पाच किलोमीटरवर शेती आहे. तसेच गच्चीवरही त्यांनी सुरेख बाग साकारली आहे.

घरात पडणारा जो काही पालापाचोळा आहे, त्याचे ते खत तयार करतात. त्यांनी शेजारपाजारच्यांनाही सांगून ठेवलंय, तुमच्याकडे जो काही कचरा आहे तो मला आणून द्या. म्हणजे साधारण असा वर्षाचा दोनेक ट्रक कचऱ्याचा निचरा भटेवरांच्या गच्चीवरच्या बागेतच होतो. कारण गच्चीवर त्यांनी या कचऱ्याचंच बेड तयार केलं आहे. त्याचा निचरा झाल्यानंतर काही शिल्लक राहत नाही. त्यामुळे त्यावर पुन्हा कचरा टाकला जातो. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे भटेवरांना त्यांचाच कचरा कमी पडतो. त्यामुळे ते शेजारपाजारचाही कचरा घेऊन येतात. या गच्चीवरच्या बागेला आठदहा वर्षे झाली आहेत. अशी बाग गच्चीवरच नाही, तर तुमच्याकडे जेवढी जागा उपलब्ध आहे, त्या जागेवरही होऊ शकते हे भटेवरांना सांगायचं आहे.

गौतम भटेवरा यांचं घर एक कार्यशाळा आहे, जेथे कचरा, सांडपाण्याचं उत्तम आणि सुयोग्य पद्धतीने नियोजन | Sewage Management | होतं. त्यांच्या या उपक्रमाची माहिती काही शाळांनीही घेतली होती. म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे समजून सांगायचं असेल तर शिक्षक विद्यार्थ्यांना थेट भटेवरांच्या घरीच घेऊन जातात. सांडपाण्याचे व्यवस्थापन असो किंवा मलविसर्जनापासून सोनखत तयार करायचं असेल तर त्यासाठी जागा तेवढी उपलब्ध हवी. मलविसर्जनासाठी सेफ्टिक टँकइतक्याच जागेची गरज असते. म्हणजे हे मल विसर्जनाचं रोटेशन तीनचार वर्षांनंतर निघतं. त्याची पूर्णपणे काळी मातीच झालेली असते. कोणतीही दुर्गंधी त्याला नसते. ते पिकांसाठी उत्कृष्ट सोनखत असतं. मुळात तुमच्याकडे तेवढी जागा असणं आवश्यक आहे. फक्त तेवढं असून चालत नाही, तर तशी मानसिकता असणेही गरजेचे आहे. कारण हे जे कचऱ्याचं नियोजन आहे, त्याला थोडासा वेळ देता आला पाहिजे. त्यातही आवड असली पाहिजे. आपल्याला एक सवय लागली आहे, घंटागाडी आली की लगेच त्यात कचरा जाऊन टाकतो. थोडेसे कष्ट घेतले आणि पर्यावरणाची जाण असेल, तरच हे शक्य आहे.

गौतम भटेवरा

सांडपाण्याचं नियोजन  | Sewage Management | 

गौतम भटेवरा यांचं सांडपाण्याचं नियोजनही अफलातून आहे. धुणीभांडीचं जे सांडपाणी आहे, त्याला एक फिल्टर प्लँट तयार केलेला आहे. याच पाण्यावर त्यांची अंगणातली बाग बहरली आहे. त्यांनी पीव्हीसी पाइपला वेगवेगळे कंट्रोलिंग व्हॉल्व ठेवले होते. ज्या झाडाला पाणी सोडायचं त्याच झाडाला ते पाणी सोडता येईल अशी ती रचना आहे. हा अंडरग्राऊंड पाइप आहे. म्हणजे जवळपास जमिनीखाली सहा इंच असेल. त्यामुळे झाले काय, की वर कुठेही ओलावा दिसत नाही आणि बाकीचा दुर्गंधी वगैरेचाही त्रास नाही. जिथे जिथे झाडं लावली तिथं तिथं ते पाणी सोडण्यात आलं. हे सगळं पाणी फिल्टर करूनच झाडांना दिलं जातं. त्यामुळे बाहेरून पाणी देण्याची गरजच पडली नाही. अशा प्रकारे त्यांनी सांडपाण्याचा पुनर्वापर केला. याच पाण्यावर ही झाडं इतकी मोठी झालीय, की त्यांना आता पाण्याची गरजच उरलेली नाही. बरं हे सगळं करताना भटेवरांनी काही गोष्टी प्रकर्षाने पाळल्या आहेत. ते म्हणजे कपडे धुण्यासाठी त्यांनी कोणतीही डिटर्जंट पावडर वापरलेली नाही. कारण डिटर्जंट झाडांसाठी हानिकारक असते. त्याऐवजी त्यांनी ऑइल केक वापरला आहे, ज्याला पिवळा साबण म्हंटले जाते. भटेवरांच्या घरी हाच साबण असतो. कारण त्यात कोणतेही डिटर्जंट नसते. सौ. भटेवरांच्या मते, या साबणाला कमी पाणी लागते. कारण त्याचा फेस जास्त होत नाही. त्यावर आणखी एक प्रयोग भटेवरांनी केला आहे. तो म्हणजे या साबणाचा कीस करून तो पाण्यात भिजत ठेवतात. त्याचं पाणी झालं, की त्यात कपडे भिजवूनही ते उत्तम धुतले जातात. त्यामुळे पाण्यात रासायनिक घटक फारसे मिसळत नाहीत. त्याचा फायदा त्यांच्या झाडांना झाला आहे.

असं केलं मैला व्यवस्थापन

सांडपाणीच नाही, तर मैलाही बाहेर जात नाही. मैला जमा करण्यासाठी सेफ्टिक टँक नाही, तर तेवढ्याच आकाराचे दोन चेंबर केले आहेत. या चेंबरवर भटेवरांनी कडप्पा टाकून वर मातीचा एक फूट थर दिला आहे. त्यावर ते भाजीपाल्याचं पीक घेतात. गौतम भटेवरा यांनी त्यावर हळदीचंही उत्पादन घेतलं आहे. मैल्यामुळे जो गॅस बाहेर येतो, तोही या मातीतच झिरपतो. एरव्ही प्रत्येक घराच्या शौचालयावर एक व्हेंट पाइप काढला जातो, ज्यातून गॅस बाहेर फेकला जातो, तसा पाइप भटेवरांकडे पाहायला मिळत नाही. कारण त्यांना त्याची गरजच उरलेली नाही. सगळा गॅस जमिनीतच झिरपतो. सेफ्टिक टँकपेक्षा या चेंबरला खर्चही कमी येतो. एकूण दोन चेंबर आहेत. त्यामुळे जेव्हा एक चेंबर भरतो, तोपर्यंत दुसरा चेंबर बंद राहतो. एक चेंबर भरायला जवळपास तीनचार वर्षे लागतात. साधारण पाच जणांचं कुटुंब असेल तर एवढा कालावधी लागतो. एक चेंबर भरला की दुसरा चेंबर सुरू करायचा. मग या दुसऱ्या चेंबरमध्ये मैला जमा होईपर्यंत पहिला चेंबर साधारण चारपाच महिन्यांमध्ये कोरडा होतो. तो कोरडा झाला की त्याची माती बागेला सोनखत म्हणून उपयोगात येते. काळी माती जशी असते तसा हा मैला होतो. त्याला दुर्गंधीही नसते. सध्या आपण नद्या-नाल्यांची अवस्था पाहतो, त्यात सर्रास मैला, सांडपाणी सोडले जाते. मात्र, त्याचा असा उपयोग केला तर नद्यांचं प्रदूषणच होणार नाही. भटेवरांनी नासर्डी नाल्याची (नंदिनी नदी) अवस्था जवळून पाहिली आहे. 2005 मध्ये पावसाळ्यात पूर आला तेव्हा सगळा नाला स्वच्छ झाला होता. आता दोन-दोन दिवस पाऊस झाला तरी पाणी काळेच दिसते, इतकं हे प्रदूषण वाढलं आहे. नाशिकमध्ये 30-40 टक्के लोकं बंगल्यांमध्ये राहतात. त्यांनी जरी हा प्रकल्प केला तरी बरचसं प्रदूषण कमी होईल, असं भटेवरांना वाटतं. त्यांनी सुरुवातीला गांडूळ खताचाही प्रकल्प राबविला होता. नंतर त्यांनी कचऱ्याच्या व्यवस्थापनावरच जास्त लक्ष दिलं. कारण ते सहज उपलब्ध होतं.

अंगणातील बाग नव्हे, नंदनवन!

गौतम भटेवरा

सांडपाण्यावर त्यांची बाग आता पूर्णपणे बहरलेली आहे. झाडं आता इतकी मोठी झाली आहेत, की त्यांना पाण्याची फारशी गरज राहिलेली नाही. आता त्यांनी गच्चीवर जी बाग केली आहे, त्याला फिल्टर केलेले सांडपाणी देण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. महापालिका किंवा बोअरचं पाणी न वापरता सांडपाणीच कसं वापरता येईल, यावर ते विचार करीत आहेत. कारण आता त्यांचं जे सांडपाणी फिल्टर होतं, ते नेहमीच्या उपयोगापेक्षा अधिक आहे. हे पाणी त्यांना गच्चीवर वापरता येणार आहे. गच्चीवर भाजीपाल्यासह फळांची झाडं आहेत. या गच्चीवर नुकतंच त्यांनी 25 किलो हळदीचं उत्पादन घेतलं होतं. रताळ्यांचेही उत्पादन घेतात. गिलकी, दोडकी, दुधी भोपळा, कारले, गाजर, लिंब एवढेच नाही तर कांद्याचीही लागवड त्यांनी केली आहे. संपूर्णपणे कचऱ्याचं बेड तयार करूनच त्यावर ही सगळी उत्पादनं घेतली जात आहेत. या कचऱ्याचेच पुढे मातीत रूपांतर होते. त्यामुळे भटेवरा कुटुंबाला संपूर्णपणे नैसर्गिक भाजीपाला या गच्चीवरून आणि अंगणातील बागेतून मिळत आहे. भटेवरांच्या बागेत चकोतराचं झाड उंचच उंच वाढलं आहे. चकोतरा हे बिहारमधलं फळ आहे. विशेषतः अॅसिडिटी आणि किडनी स्टोन आजारावर हे फळ उत्तम उपाय मानलं जातं. आंबा, लिंबू, नारळ, दुधी भोपळा, शेवगा, पेरू, रामफळ अशी अनेक झाडं भटेवरांच्या बागेत पाहायला मिळतात. अळूची पानंही छान वाढलेली आहेत. त्यांचा आकार इतका मोठा होता, की तशी अळूची पानं बाजारपेठेत माझ्या पाहण्यात तरी आलेली नाहीत. त्यांच्या बागेतली नागवेलीच्या पानांची वेलही बहरलेली आहे.

आठवणीतला निफाडराज

गौतम भटेवरा मूळचे निफाडकर. त्यांचं सहावीपर्यंतचं शिक्षण निफाडमध्येच झालं आहे. निफाडमध्ये त्यांच्या वडिलांची शेती होती. कालांतराने ती विकली. त्याला आता 25 वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र, या शेतीच्या आठवणी भटेवरांच्या मनात आजही दाटून येतात. गौतम भटेवरा यांना तीन मुलं आहेत. दोन मुलगे आणि एक मुलगी. तिघंही स्थिरस्थावर झाली आहेत. एक मुलगा अमेरिकेत असतो, तर दुसरा त्यांच्यासोबतच आहे. मुलीचे आर्किटेक्ट झाले आहे. तिघांचेही विवाह झाले आहेत. निफाडमध्ये भटेवरांचं धान्याचं दुकान होतं. शेती विकल्यानंतरही या दुकानामुळे शेतकऱ्यांशी सलोख्याचं नातं टिकून होतंच. त्यांना पूर्वीची आणि आताची शेती यातला फरक प्रकर्षाने जाणवतो. पूर्वीच्या 146, निफाडराज या गव्हाच्या जाती अजूनही आठवतात. निफाडराज गहू खास रव्यासाठी वापरला जायचा. या सगळ्या अस्सल निफाडच्या जाती. त्या आता लुप्तच झाल्याची खंत भटेवरांना जाणवत राहते. असे उत्तम दर्जाचे गहू कुठे पाहायलाही मिळत नाहीत. त्या वेळी एकरी 40-45 कट्टे गहू काढलेले शेतकरी होते. हा सगळा शेतीचा प्रवास भटेवरांनी जवळून पाहिला आहे. त्यामुळेच त्यांची शेती, माती, पर्यावरणाशी घट्ट नाळ जुळलेली आहे. ती त्यांच्या अंगणातल्या पानापानांतून, मातीच्या गंधातून जाणवत राहते. माणूसपण समृद्ध करीत जाते…. 
Follow us
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#81d742″ header_line_color=”#81d742″ include_category=”1635″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!