All SportsCricket

बीसीसीआय अध्यक्षपदी रॉजर बिन्नी का?

बीसीसीआय अध्यक्षपदी रॉजर बिन्नी का?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची अपेक्षितपणे निवड झाली. 1983 चा वर्ल्ड कप जिंकण्यात रॉजर बिन्नी यांचं योगदान चाळीस-पन्नाशीतली पिढी अजिबात विसरू शकणार नाही. त्यामुळे ते बीसीसीआयचे अध्यक्ष झाले तर कुणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. मात्र, तरीही प्रश्न आहे, तो म्हणजे रॉजर बिन्नीच का? सौरव गांगुली यांना दुसरी टर्म मिळाली नसती का? यामागे राजकीय खेळी आहे की गांगुली डोईजड झाला होता?

भारताच्या 1983 च्या वर्ल्ड कप विजेतेपदात मोलाची कामगिरी बजावलेले रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे अध्यक्ष झाले. सौरभ गांगुली यांच्याऐवजी रॉजर बिन्नी यांची वर्णी लागली. सौरव गांगुली यांना दुसरी टर्म मिळाली नाही; पण जय शहा सचिवपदी कायम राहिले. यावरून सध्या राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजपने 2014 मध्ये केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर हळूहळू सर्व क्षेत्रांवर आपलं वर्चस्व राखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला क्रीडा क्षेत्र तरी अपवाद कसे राहणार? किंबहुना राजकारणाचे मैदान मारण्यासाठी अनेकांनी क्रीडा संघटनांत शिरकाव केल्याची अनेक उदाहरणे आहेत. भाजपकडूनही हे प्रयत्न होणे साहजिक आहे. कारण बीसीसीआयसारख्या सर्वोच्च क्रीडा संस्थेवर वर्चस्व राखण्याचे मनसुबे जय शहा यांच्या प्रवेशाने यापूर्वीच स्पष्ट झाले होते. एक राजीव शुक्ला यांचा अपवाद सोडला तर बीसीसीआयवर सर्वच पदाधिकारी भाजपशी संबंधित आहेत.

बीसीसीआय अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांचीच का वर्णी?

सौरव गांगुली यांना आणखी एक टर्म मिळायला हवी होती. मात्र, तसे न करता रॉजर बिन्नी यांचं नाव पुढे करण्यात आलं.

रॉजर बिन्नी यांनी 18 ऑक्टोबर 2022 रोजी मुंबईत होणाऱ्या बोर्डाच्या विशेष सभेत अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.

त्यांचं नाव अचानक कसं चर्चेत आलं, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. तसं पाहिलं तर कर्नाटक क्रिकेट संघटनेच्या सचिवपदी संतोष मेनन आहेत.

मात्र त्यांच्याऐवजी रॉजर बिन्नी यांचं नाव पुढं करण्यात आलं. मेनन यांची ओळख फारशी कुणाला नाही.

बिन्नी त्यांच्यापेक्षा अधिक उजवे आहेत. एक तर रॉजर बिन्नी यांची प्रतिमा स्वच्छ आहे.

ज्या वेळी रॉजर बिन्नी निवड समितीत होते, त्या वेळी त्यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी भारतीय संघात प्रवेशासाठी धडपडत होता.

भारतीय संघासाठी स्टुअर्टचा विचार होऊ शकतो हे लक्षात आल्यावर रॉजर बिन्नी यांनी तातडीने निवड समितीचा राजीनामाही दिला होता.

हा प्रामाणिकपणा कदाचित त्यांना अध्यक्षपदाकडे घेऊन गेला असावा.

मात्र, एवढंच कारण पुरेसं असेल असं अजिबात वाटत नाही.

त्याला दुसरीही एक बाजू असल्याचं विरोधकांचं मत आहे. ते म्हणजे पुढच्या वर्षी 2023 मध्ये कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका आहेत.

अशा वेळी बीसीसीआय अध्यक्षपद कर्नाटकातीलच रॉजर बिन्नी यांना देण्याची खेळी भाजप का नाही करणार?

तृणमूल काँग्रेसनेही आरोप केला आहे. त्यांनी रॉजर बिन्नी यांच्या निवडीवर नाही, तर सौरव गांगुलींना जाणीवपूर्वक डावलल्याबद्दल आरोप केला आहे.

कारण सौरव गांगुली पश्चिम बंगालचा आहे आणि बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे.

तृणमूल काँग्रेसचे शांतनू सेन म्हणाले, की हे राजकीय वचपा काढण्याचे उदाहरण आहे. गृहमंत्र्याचा मुलगा जय शहा बीसीसीआयच्या पुन्हा सचिवपदी राहू शकतो.

मात्र, गांगुली राहू शकत नाही. कारण ते ममता बॅनर्जी यांच्या राज्यातील आहेत आणि त्यांची भाजपशी जवळीकही नाही.

हे राजकीय वचपा काढण्याचे उदाहरण आहे. गृहमंत्र्याचा मुलगा जय शहा बीसीसीआयच्या सचिवपदी राहू शकतो. मात्र, गांगुली असे करू नाही शकत. कारण ते ममता बॅनर्जी यांच्या राज्यातील आहेत आणि त्यांची भाजपशी जवळीकही नाही.
– शांतनू सेन, तृणमूल काँग्रेस

तृणमूल काँग्रेसचे लोक फक्त राजकारण करतात. ज्या लोकांनी कधी सौरव गांगुलीसाठी आवाज उठवला नाही, ते आज अश्रू ढाळत आहेत. गांगुली यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यात एवढं राजकारण करण्याची काय गरज आहे.
– दिलीप घोष, भाजप

काँग्रेसचा एकमेव व्यक्ती बीसीसीआयमध्ये!

बीसीसीआयवर एकछत्री अंमल आणण्याचे भाजपचे मनसुबे आहेत आणि त्यात ते यशस्वीही झाले आहे. बीसीसीआयच्या कार्यकारिणीतील काँग्रेसचे एकमेव असलेले राजीव शुक्ला उपाध्यक्षपदी कायम राहिले. मात्र, त्यांना पुन्हा उपाध्यक्षपद का बहाल केलं हे अनाकलनीय आहे. गमतीने असं म्हंटलं जातंय, की जेव्हा गांगुलीने लॉर्ड्स मैदानाच्या बाल्कनीतून अंगातला शर्ट काढून हवेत फिरवला, तेव्हापासून राजीव शुक्ला बीसीसीआयच्या कोणत्या ना कोणत्या पदावर आहेत. असो, कदाचित ही त्यांची बीसीसीआयमधील अखेरची टर्म असावी. अर्थात, शुक्ला यांची महत्त्वाकांक्षा मोठी आहे. सध्या बृजेश पटेल आयपीएलचे प्रमुख आहेत. ते नोव्हेंबर 2022 मध्ये 70 वर्षांचे होतील. नियमानुसार, सत्तरीतला व्यक्ती आयपीएलचा प्रमुखपदी राहू शकत नाही. अशा वेळी राजीव शुक्ला या पदासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना उपाध्यक्षपदावरच समाधान मानावे लागले.

गांगुलीने नाकारले आयपीएलचे प्रमुखपद

बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष सौरभ गांगुली अध्यक्षपदावर राहण्यास उत्सुक होते.

मात्र, त्यांना बीसीसीआयवर पुन्हा संधी दिली नाही. यामागचं कारण वेगळं आहे.

यापूर्वी सर्वच अध्यक्षांना एकच टर्म देण्यात आली आहे, असे सांगून त्यांना नकार दिल्याचे सांगितले जाते.

सौरव गांगुली यांना आयपीएलचं प्रमुखपद देऊ करण्यात आलं होतं; पण जी व्यक्ती बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवते, ती एका उपसमितीचे अध्यक्षपद कसे स्वीकारेल?

म्हणूनच गांगुलींनी हे पद नाकारलं. गांगुली यांनी नकार दिल्यामुळेच या पदावर आता अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुणसिंह धुमल यांना बढती देण्याचा निर्णय झाला.

गांगुली यांच्या माघारीमुळे आसामच्या मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय सैकिया यांचाही मार्ग मोकळा झाला.

असं म्हणतात, की सौरव गांगुली यांची बिन्नी यांच्या विरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची तयारी आहे.

अर्थात ही चर्चा आहे. तसे होण्याची सूतराम शक्यता नाही.

एक अंदाज असा लावला जात होता,, की सौरव गांगुली आयसीसीच्या अध्यक्षपदावर दावेदारी करू शकतील.

मात्र, तसंही काही झालं नाही.

कारण हे सर्व ‘बीसीसीआय’वर अवलंबून होतं आणि आयसीसीच्या अध्यक्षपदाचा निर्णय यापूर्वीच निश्चित झालेला होता.

फक्त उघडपणे त्याची वाच्यता झाली नाही एवढंच.

बीसीसीआय रॉजर बिन्नी
ADVT

बीसीसीआयमध्ये ‘नेपोटिझम’

नाही म्हंटलं, तरी बीसीसीआयमध्ये ‘नेपोटिझम’ भाजपने सर्रास सुरू केलं आहे.

अनुराग ठाकूर यांचा लहान भाऊ अरुणसिंह धुमल सध्या खजिनदार आहेत. त्यांची वर्णी आयपीएलच्या प्रमुखपदी झाली.

अर्थात, ही निवड आधीच पक्की होती. महाराष्ट्रातील आशिष शेलार धुमल यांच्या जागेवर खजिनदार झाले.

हेही निश्चित होतं. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांचे निकटवर्तीय देवजित सैकिया यांचीही वर्णी लागली.

त्यांच्याकडे सहसचिव पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. ‘नेपोटिझम’चं आणखी एक उदाहरण आहे.

माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचा मुलगा अविशेक यांचा आयपीएलच्या प्रशासकीय समितीत समावेश करण्यात आला.

अविशेक दालमिया हे बंगाल संघटनेचे प्रतिनिधी नाहीत; पण नियमानुसार भारतीय क्रिकेट बोर्डासाठी नियुक्त प्रतिनिधी नसले तरी त्यांना समितीत स्थान देता येते. याच नियमाचा आधार घेऊन दालमिया यांच्या मुलाचा समावेश करण्यात येणार आहे.

जगमोहन दालमिया यांनी बीसीसीआयवर एक काळ गाजवला होता.

त्यांचे 20 सप्टेंबर 2015 रोजी निधन झाले. आता त्यांचा मुलगा अविशेक बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीत शिरकाव करणार आहे.

अविशेकची बहीण भैशाली तृणमूल काँग्रेसची आमदार आहे. वडिलांच्या निधनानंतर वर्षभरातच तिने तृणमूलमध्ये प्रवेश करीत उमेदवारी घेतली आणि निवडूनही आली.

ही पार्श्वभूमी असताना अविशेकचा प्रवेश त्याच्या वडिलांच्या योगदानाची ‘पुण्याई’ म्हणता येईल.

कोण आहेत रॉजर बिन्नी?

रॉजर बिन्नी यांचं मूळ स्कॉटलंड देशाशी संबंधित आहे.

बिन्नी यांचा मूळ परिवार स्कॉटलंडचा असला तरी रॉजर यांचा जन्म भारतातलाच. इथंच शिकले, क्रिकेट खेळले.

भारताचे ते पहिले अँग्लो क्रिकेटपटू होते. रॉजर बिन्नी 1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघात होते. स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज म्हणूनही त्यांचा लौकिक होता.

रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी हादेखील चांगला क्रिकेटपटू आहे.

आयपीएलमध्येही त्याने आपली छाप सोडली. स्टुअर्टने भारताकडून आंतरराष्ट्रीय वनडे सामनेही खेळले आहेत.

वन डे सामन्यात सर्वोत्तम षटके टाकण्याचा विक्रम स्टुअर्ट बिन्नीच्याच नावावर आहे.

आयपीएलच्या 2012 मध्ये तो मयंती लँगरच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी विवाहबद्धही झाला.

मयंती लँगर आयपीएलसाठी स्टार स्पोर्ट्सची अँकर म्हणून काम करीत होती. 2020 नंतर तिला अँकरच्या पॅनलमधून वगळले. असो…

हा आहे रॉजर बिन्नी यांचा परिवार. 80 च्या दशकात रॉजर बिन्नी यांचाही एक काळ होता.

त्यांनी 8 सामन्यांत 18 गडी बाद केले होते. वर्ल्ड कपमध्येच ऑस्ट्रेलियावरुद्ध त्यांनी 29 धावा देत 4 गडी बाद केले होते.

प्रत्येक सामन्यात त्यांनी विकेट घेतल्या. त्यांची लक्षात राहणारी स्पर्धा म्हणजे 1985 मधील बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ क्रिकेट.

ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात झाली होती. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला अंतिम सामन्यात पराभूत करून विजेतेपद मिळवले होते.

या स्पर्धेत रॉजर बिन्नी यांची गोलंदाजी प्रभावी ठरली. ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे यशस्वी गोलंदाज ठरले.

त्यांनी 4 सामन्यांत 29.5 षटके टाकली आणि 9 गडी टिपले होते. भारताचा या स्पर्धेतील पहिला सामनादेखील पाकिस्तानविरुद्धच होता.

रॉजर बिन्नी यांनी पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज मोहसीन खान, कर्णधार जावेद मियांदाद, तसेच राशीद खान आणि अनिल दलपत यांना तंबूचा रस्ता दाखवला.

बिन्नी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत विश्वविजेता

रॉजर बिन्नी यांनी भारतातर्फे 27 कसोटी आणि 72 वनडे सामने खेळले. कसोटी सामन्यात त्यांनी 47 विकेट घेण्याबरोबरच 830 धावाही केल्या. 1983 मध्ये पाकिस्तानविरुद्धची नाबाद 83 धावांची खेळी आजही पन्नाशीतली पिढी विसरणार नाही. कारण त्यांच्या या खेळीमुळेच भारत पराभवाच्या खाईतून परत आला होता. वन-डेमध्ये त्यांनी एकूण 77 विकेट घेतल्या आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ते क्रिकेटच्या विविध आघाड्यांवर काम करीत राहिले. सप्टेंबर 2012 मध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीत ते आले. तत्पूर्वी ते 19 वर्षांखालील भारतीय युवा संघाचे मुख्य प्रशिक्षकही होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारताने 2000 मध्ये वर्ल्ड कप जिंकला.

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!