आठवणींचा धांडोळा

१९८९ : ए स्कूल स्टोरी

 

pimpalgaon high school

१९८९ : ए स्कूल स्टोरी

 

पिंपळगाव हायस्कूल… एक प्रशस्त शाळा… तब्बल २५ वर्षांपूर्वी पाहिलेली गुलमोहराची भरगच्च झाडं आज दिसत नव्हती; पण तरी शाळेतल्या अनामिक हजेरीने परिसर मोहरला होता. त्याला कारणही तसंच होतं. तब्बल २५ वर्षांपूर्वीची १९८९ची दहावी ‘अ’ची बॅच नुकतीच शाळेत आली होती. मित्रांच्या भेटीसाठी आसूसलेली होती…
ए. व्ही. जाधव सर वर्गात आले आणि सर्व मुले एका आवाजात म्हणाली, गुड आफ्टरनून सर! तेवढ्यात उशिरा आलेला पंकज म्हणाला, सर आत येऊ का?… सरांचा गणिताचा विषय. पण आज ते शिकविणार नव्हते. बेंचवर बसण्यावरून मुलांमध्येही हमरीतुमरी नव्हती. पहिल्या बाकावरची मुलं शेवटच्या बाकावर बसली होती; पण चेहऱ्यावर नाराजी नव्हती.
मोबाइल खणखणला तर बाहेर जात होती आणि पुन्हा येऊन बेंचवर बसत होती. कुणाच्याही चेहऱ्यावर आज अभ्यासाचं टेन्शन नव्हतं. कारण तब्बल २५ वर्षांनी दहावी ‘अ’ची बॅच एकमेकांना आनंद शेअर करण्यासाठी, जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र आली होती.
नितीन पिपाडाचे डोक्यावर केस उरले नव्हते, दिनेश अनारसेच्या देहबोलीत कोणताही बदल जाणवत नव्हता, तर सगळ्यांत लहान निरागस दिसणारा सुनील फुले फुगलेल्या तब्येतीमुळे अनेकांना ओळखूही येत नव्हता. त्याची ओळख करून देताना दिनेश गमतीने म्हणाला, सर, तो आधी फुलासारखा होता, आता त्याचं झेडूंचं फूल झालंय आणि एकदम हशा पिकला.
बापूराव महाले अचानक उठला आणि महेशकडे बोट दाखवून म्हणाला, सर, याच्यामुळे तुम्ही मला दहावीला खूप मारलं होतं. त्या वेळी हा हसला होता; मी नाही. सुरेख चित्रकारितेसाठी ओळखला जाणारा विलास हांडगे, टापटीप राहणारा रजनीश बच्छाव, दत्तूच्या गाड्यावरची चिक्की गुपचूप खाणारे संदीप मंडलिक, कीर्ती पटेल, शाळेचा मॉनिटर प्रवीण गांगुर्डे, ‘टेस्टट्यूब’ म्हणून चिडवले तरी स्मितहास्य करणारा नितीन पवार, शांत स्वभावाचा विनोद मराठे अशी सगळी मंडळी बेंचवर जाधव सरांचा तास तन्मयतेने ऐकत होती.
सिन्सिअर विद्यार्थी संदीप बऱ्हाटेला पहिल्या बाकावर बसण्याची संधी शाळेत कधी मिळाली नव्हती. या वेळी मात्र तो आवर्जून पहिल्या बाकावर बसला होता. वर्गातला सर्वांत वात्रट माधव बनकर उर्फ पिंट्या या वेळी मात्र शांत बसलेला होता.
कोणतीही चुळबूळ जाणवत नव्हती. प्रशांत भटेवरा, संदीप भटेवरा, योगेश भटेवरा, रवींद्र काळे यांनी बाजारचा दिवस असूनही शाळेत हजेरी लावली होती. शाळेतला आदर्श विद्यार्थी बबन गिते नेहमीप्रमाणेच गंभीर होता.
pimpalgaon high schoolप्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, पण या आनंदाला एक दुःखाची किनार होती. ती म्हणजे अरुण कुऱ्हाडे, अनिल बेलेकर, तुषार मोरे हे तीन शाळकरी मित्र आज हयात नव्हते.
शाळेचे मुख्याध्यापक आर. ई. वाघ, बाफना सरांसह अनेक शिक्षकही हयात नव्हते. त्यांना श्रद्धांजली अर्पण करूनच शाळेचा तास जाधव सरांनी पुढे सुरू केला.
गेल्या वर्षीच ते मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले. त्यामुळे काल आणि आजच्या पिढीतलं अंतर त्यांच्याकडून जाणून घेताना कमालीची उत्सुकता लागली होती. आजच्या पिढीला रागावलं की शिक्षकावर राग व्यक्त केला जातो. पालकाला घेऊन येतो. त्या वेळी तसं नव्हतं.
जाधव सर शाळेतल्या बदलत्या स्थित्यंतराचे पदर उलगडत होते. शाळेतले दोन तास कसे संपले ते कळलंच नाही. एका मास्तरचं एवढं मोठं लेक्चर प्रथमच सर्वांनी तल्लीनतेने ऐकलं असेल. लेक्चर संपलं. जाधव सरांचा गौरव सोहळाही झाला आणि उत्सुकता लागली एकमेकांविषयी जाणून घेण्याची.
जुन्या मित्रांना भेटताना नव्याने ओळख करून घेण्याचा आनंदही वेगळाच होता. प्रशांतने इंजिनीअरिंगनंतरही आपला पिढीजात व्यापार सांभाळला. आज तो ‘आयडिया’चा महाराष्ट्रातला प्रसिद्ध डिस्ट्रिब्यूटर आहे.
दिनेशचे आठ ते दहा ठिकाणी क्लासेस सुरू आहेत. बापू प्रगतिशील द्राक्ष बागायतदार आहे. बहुतांश मित्र व्यवसायात पुढे गेले होते. प्रवीणने सर्वांसाठी मनुके आणि डाळिंब आणले होते.
खास पॅकिंगमध्ये त्याने सर्वांना ती अपूर्व भेट दिली. सगळ्यांचे गाल वर आले होते. ते निस्तेज होऊ नये म्हणून कदाचित प्रवीणने हे गिफ्ट आणलं असेल. संदीपने सर्वांसाठी खास पेन गिफ्ट केलं. या गिफ्टवरून सुनीलला बाफना सरांची तीव्रतेने आठवण झाली.
शाळेत बाफना सर इंग्रजी विषय शिकवायचे. त्यांनी इंग्लिश ग्रामरमध्ये प्रथम येणाऱ्यास पेन गिफ्ट देण्याचं कबूल केलं होतं. आज संदीपने पेन गिफ्ट केल्यानंतर वाटलं, की जणू बाफना सरांनीच पेन गिफ्ट केलंय…!
शाळेच्या त्या दगडी इमारतीचा बाह्य लूक काहीसा बदलला होता. ज्या सेंट्रल हॉलमध्ये रोज प्रार्थनेला बसायचो, त्या हॉलमध्ये सगळे मित्र एकत्र आले. तेव्हा त्यांना आर. ई. वाघ सरांची प्रश्नमंजूषा आठवली.
वाघ सरांनी याच सेंट्रल हॉलमध्ये रात्रीची अभ्यासिका सुरू केली होती. पाचवीतल्या सुमारे तीस वर्षांपूर्वीच्या काही आठवणींनाही अनेकांनी उजाळा दिला.
ए. के. वाघ सरांची काश्मिरी मुळी अनेकांना आठवली. खरं तर या सर्वांना एकत्र आणण्यामागे योगेश घोडकेचा वाटा मोठा होता. व्हॉट्सअॅपवर त्याने प्रत्येकाला जोडले. नंतर व्हॉट्सअॅपवर या सर्व आठवणींचा अक्षरशः पाऊस पडला.
दिनेश म्हणाला, ‘मला वाटलं होतं, की मलाच गरज आहे मित्रांची; पण गेट टुगेदरच्या निमित्ताने जाणवलं, की सर्वांनाच गरज होती एकमेकांची.’
ग्रुप अॅडमिन योगेशने जुने दिवस परत आल्याचं म्हटलं; तर प्रशांत भटेवराने, आपले मित्र नव्यानं भेटल्याचं सांगितलं. बापूने, तब्बल २५ वर्षांनी सगळे यशस्वी मित्र पाहिल्याचा आनंद व्यक्त केला. एक सुंदर दिवस अनुभवल्याचे तो म्हणाला.
थोडक्यात म्हणजे, प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर तब्बल २५ वर्षांचं अंतर आठवणींनी एका घोटात गिळलं होतं… भेटीतून एक स्पष्टपणे जाणवलं, की शाळेचा एक प्रवास संपला होता, तर प्रपंचातला दुसरा प्रवास सुरू झाला होता…
 (Maharashtra Times, Nashik : 10 May 2014)

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!