All SportsKabaddiSports Review

नाशिक कबड्डी : साठी ओलांडली तरी…!

नाशिक जिल्हा सध्या कबड्डीने ढवळून निघाला आहे. मनमाड कबड्डी प्रीमिअर लीगनंतर अवघ्या एक आठवड्यानंतर नाशिकमध्ये ६२ वी जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा झाली. देखणे आयोजन एवढेच या स्पर्धेविषयी म्हणता येईल. या स्पर्धेविषयी…!

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची ‘स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’ येथे प्रकर्षाने आठवते…

‘‘पन्नाशीची उमर गाठली 
वाट वाकडी धरू नका। 
माणूस म्हणजे पशू नसे। 
हे ज्याच्या हृदयात ठसे। 
नर नारायण तोच असे।
लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरू नका।’

साठीची उमर ओलांडलेल्या कबड्डीची विनवणीही यापेक्षा वेगळी नसेल! महाराष्ट्राला कबड्डी, खो-खो, कुस्तीचा जेवढा समृद्ध इतिहास आहे, तेवढा अन्य कोणत्याही खेळाला नसेल. कालौघात अनेक पारंपरिक खेळांना ओहोटी लागली तरी नाशिक जिल्ह्यावर कबड्डीची पकड अजूनही घट्ट आहे. बुवा साळवींच्या आदर्शावर कबड्डीची वाटचाल प्रशस्त होत आहे. मनमाडमध्ये ५ ते ११ ऑक्टोबरदरम्यान झालेली एमकेपीएल आणि नाशिकमध्ये १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या ६२ व्या जिल्हास्तरीय निवड चाचणी कबड्डी स्पर्धेवरून त्याचा प्रत्यय येतो. मात्र, साठी ओलांडली तरी नाशिक जिल्ह्याची कबड्डी अजूनही प्रगल्भ झाली नाही का, असा प्रश्न निवड चाचणीवरून क्रीडाप्रेमींना पडल्याशिवाय राहणार नाही. रांगडा खेळ असला तरी अंगातली रग खेळात दिसायला हवी. दुर्दैवाने तसं दिसलं नाही. स्पर्धेच्या देखण्या आयोजनाने डोळ्यांचे पारणे फेडले असले तरी पंच, खेळाडूंच्या बेशिस्तीमुळे देखणे आयोजन झाकोळले. साठीनंतरही कबड्डी प्रगल्भ होत नसेल तर जिल्हा संघटनेने खरोखर अंतर्मुख होऊन विचार करायला हवा.

नाशिक जिल्ह्यात सध्या ४० ते ४५ अधिकृत क्लब आहेत. रजिस्टर नसलेल्या क्लबसह हीच संख्या शंभरापर्यंत जाईल. मात्र, संख्यात्मक वाढ हे कबड्डीचं वैभव नसतं. गुणात्मक वाढीसाठी संघटनेने प्रयत्न करायला हवेत. निवड चाचणीतून त्याची उणीव प्रकर्षाने जाणवली. कारण चढायांमध्ये कौशल्य फारसं पाहायला मिळालं नाही. अटीतटीच्या लढतींमध्ये खेळाडूंना पंचांच्या सदोष निर्णयाचा फटका बसला. हे याच निवड चाचणीतलं चित्र आहे असं नाही. यापूर्वीच्याही निवड चाचण्यांत हीच परिस्थिती होती.

एकूणच नाशिक जिल्ह्यातील कबड्डीची गुणात्मक मांडणी करायची झाल्यास पुरुषांपेक्षा महिलांच्या कबड्डीला जास्तच गुण मिळतील. भलेही त्यांचा कार्यकाळ छोटा असेल. नाशिकच्या कबड्डीला खऱ्या अर्थाने महिला खेळाडूंनीच सुवर्णकाळ मिळवून दिला. अनुराधा डोणगावकर, भक्ती कुलकर्णी, निर्मला भोई अशी कितीतरी नावं घेता येतील. दुर्दैवाने, डोणगावकर, कुलकर्णींच्या वारसदार नाशिकमध्ये तयार झाल्या नाहीत.

मनमाडमध्ये १९८५ मध्ये ३४ वी पुरुष- महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा झाली होती. त्या वेळी स्पर्धेचा काय थाट होता! या स्पर्धेचं जळगाव आकाशवाणी केंद्रावर समालोचन झालं होतं. विशेष म्हणजे या स्पर्धेला त्या वेळी तिकीट आकारण्यात आलं होतं. महाराष्ट्रातली ही पहिलीच कबड्डी स्पर्धा होती ज्या स्पर्धेत तिकीट आकारण्यात आलं होतं. इतकं भरभरून प्रेम कबड्डीला मिळालं आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या कबड्डीकडून सातत्याने अपेक्षा वाढणार.

आयोजनात आमदार जयंत जाधव, प्रशिक्षक, संघटक प्रशांत भाबड यांच्यासह जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले योगदान कौतुकास्पदच आहे. किंबहुना त्यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा अन्य खेळांसाठी चपराक असेल. आमदार जाधव यांच्या अध्यक्षपदाखाली होणारी ही पहिलीच निवड चाचणी स्पर्धा. या स्पर्धेमुळे त्यांची जबाबदारी वाढली आहे. संघटनात्मक पात‍ळीवरच नाही, तर एकूणच गुणात्मक बांधणीसाठी त्यांच्याकडे नाशिक जिल्हा मोठ्या आशेने पाहत आहे.

पंचांची कामगिरी सुधारण्याची गरज

नाशिक कबड्डी

नाशिकमध्ये झालेल्या कबड्डीत पंचांची कामगिरी यथातथाच होती. अतिशय अटीतटीच्या लढतीत सामना पंचांच्या सदोष कामगिरीमुळे गमावल्याची अनेक उदाहरणे आहेत. एखाद्या निर्णयाबाबत चूक होऊ शकते. मात्र, अनेक सामन्यांत या चुका होत असतील तर त्याबाबत संघटनेने गांभीर्याने पाहायला हवं. अनेक वेळा पंच गप्पांमध्ये रंगलेले होते, तर काही पंच मोबाइलवर बोलतानाही आढळले. बेशिस्त खेळाडूंना पिवळे कार्ड दाखविण्याचा अधिकार असतानाही पंच खेळाडूशी हुज्जत घालताना आढळले. काही क्रीडाप्रेमींनी तर पंचांच्या सदोष कामगिरीबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांजवळ थेट नाराजी व्यक्त केली. त्यावर संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी विचार करण्याऐवजी युक्तिवाद केला. तुम्ही उभं राहून दाखवा, असं आव्हान दिलं. मुळात पंचांचं काम अवघड नसतं, तर महत्त्वाचं असतं! अवघड असेल तर संघटना पंचांचं क्लिनिक व्यवस्थित घेत नसतील असा त्याचा अर्थ होतो. सामना सुरू असताना चुका प्रकर्षाने टाळायला हव्यात. कारण ही स्पर्धा ६२ वी आहे; पहिली नाही!

हौशी खेळाडूंचीच गर्दी!

जिल्ह्यात कबड्डीचे क्लब भरपूर असतील; पण गांभीर्याने खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती हा प्रश्न उपस्थित होतो. साधारणपणे १८ ते २५ वर्षे वयोगटातल्या खेळाडूंपेक्षा तिशीच्या पुढील खेळाडूंची संख्या तुलनेने अधिक होती. ही चांगली गोष्ट आहे, की तिशी-चाळिशीतल्या खेळाडूंनाही खेळण्याची संधी मिळते. मात्र, जो खेळाडू संघटनेला हवाय, तो या वयोगटातला नक्कीच अपेक्षित नाही. कारण हे सर्व खेळाडू हौशी आहेत. स्पर्धेच्या आठ दिवस आधी सराव करून मैदानात उतरणाऱ्या खेळाडूंपेक्षा वर्षभर मैदानावर सराव करणारा खेळाडू उत्तम. अशा खेळाडूंचा अभाव बऱ्याच संघांमध्ये जाणवला. त्यामुळेच कौशल्य फारसं पाहायलाच मिळालं नाही. चढायांमध्ये तो त्वेश, वेगवान हालचाली, दमदार पदलालित्य आढळलं नाही. प्रो कबड्डीचे सामने घराघरांत आवडीने पाहिले गेले आहेत. कबड्डीतलं कौशल्य काय असतं हे एव्हाना सर्वांनाच उमगलं आहे. त्यामुळेच प्रेक्षकांनी कौशल्याची अपेक्षा बाळगली तर गैर नाही आणि ही अपेक्षाही का होणार नाही? कारण ही निवड चाचणी पहिली नाही; ६२ वी आहे!

शिस्तीचा अभाव

निवड चाचणी प्रकाशझोतातही रंगली. ही स्पर्धा सकाळ, दुपार, सायंकाळ अशा तीन सत्रांत झाली. तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धेतील सामन्यांच्या वेळा ना पंचांनी पाळल्या ना संघांनी! विशेष म्हणजे संघटनाही वेळेबाबत कठोर दिसली नाही. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशीचे सकाळचे सामने तब्बल चार तास उशिरा सुरू झाले. एक संघ हजर असेल तर दुसरा संघ मैदानात नसेल. पंचांनी सामन्यांच्या दहा मिनिटे आधी हजर असणे आवश्यक असताना तब्बल अर्धा तास उशिरा दाखल व्हायचे. त्याचा फटका खेळाडूंनाच बसला. कारण उन्ह डोक्यावर आल्यावर खेळातला जोश आपसूकच कमी झालेला पाहायला मिळाला. वेळेचं महत्त्व ६१ स्पर्धांनंतरही समजत नसेल तर त्याला स्पर्धा नाही जत्रा म्हणावी लागेल!

कबड्डीच्या पंढरीकडून अपेक्षा

मनमाड ही नाशिक जिल्ह्याची कबड्डीची पंढरी मानली जाते. बुवा साळवी आपल्या भाषणात कधी कधी असा उल्लेख आवर्जून करायचे. या कबड्डीच्या पंढरीत मनमाड कबड्डी प्रीमिअर लीग स्पर्धा झाली. प्रो-कबड्डीच्या धर्तीवर ग्रामीण भागात कबड्डी लीग घेणारे मनमाड महाराष्ट्रात पहिले शहर आहे. मनमाडमध्ये कबड्डीची प्रचंड क्रेझ आहे. मनमाडमध्ये स्वतःचा क्लब असणे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. तसेच या गावात अजूनही कबड्डीची घराणी आहेत. एक काळ होता, की एका संघात एकाच घरातले चार-चार भाऊ खेळायचे, तर एकाच कुटुंबांतले चार भाऊ विविध क्लबकडून एकमेकांविरुद्ध खेळायचे. सम्राट क्रीडा मंडळाच्या संघात (कै.) अशोक वाघ, उत्तम वाघ, जनार्दन वाघ, अरुण वाघ हे चार भाऊ खेळायचे. जयभवानी मंडळात गमन, अशोक, मोहन हे गायकवाड बंधू खेळले आहेत. याशिवाय गवळी बंधू, गांगुर्डे बंधू अशी किती तरी घराणी निव्वळ कबड्डीला वाहिलेली होती. आजही मनमाडमध्ये १७ क्लब आहेत. याच क्लबमधून सहा संघ निवडून गेल्याच आठवड्यात एमकेपीएल स्पर्धा झाली. लीग स्पर्धेनंतर आठवडाभरानंतर आलेल्या निवड चाचणीतही मनमाडचे क्लब सहभागी झाले होते. मात्र, या लीगच्या अनुभवाचा फायदा मनमाडच्या खेळाडूंना मिळाला नाही. निवड चाचणीत ते फारशी चमकदार कामगिरीही करू शकले नाहीत. आज सोयी-सुविधा असतानाही मनमाडचा खेळाडू मागे का पडला, याचा खरोखर विचार करण्याची गरज आहे. जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव मोहन गायकवाड मनमाडचेच. त्यांनी मनमाडच्या कबड्डीला आकार दिला. १९७५ मध्ये ते खेळायचे, तेव्हा जेवणाची भ्रांत. स्पर्धेला जायचं तर घरूनच भाकरी बांधून न्यायची. दोन-दोन दिवस तीच भाकरी खाऊन खेळायचं. खेळासाठी इतकं प्रेम असलेल्या मनमाडची कबड्डी संख्यात्मकदृष्ट्या नाही, तर गुणात्मकदृष्ट्या ओळखली जावी एवढीच अपेक्षा.

(Maharashtra Times, Nashik : 19 Oct. 2015)
[jnews_block_37 first_title=”हेही वाचा…” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ header_filter_category=”88″]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!