Jagjit Singh Life Story | जगमोहन ते जगजितसिंग या मालिकेतील हा अखेरचा भाग. या मालिकेला उदंड प्रतिसाद मिळाला. हजारो वाचकांनी या मालिकेला भेटी दिल्या. या आपल्या उदंड प्रतिसादामुळे मी आपला ऋणी आहे. या मालिकेची सांगता करतानाच याचे पुस्तकही लवकरच आपल्या हाती मिळेल. या मालिकेविषयी प्रतिक्रिया अवश्य कळवा…
जगजितसिंग | Jagjit Singh | यांचं पडद्यावरील पहिलं पाऊल पडलं, ते ‘बहुरूपी’ या गुजराती चित्रपटाद्वारे. 1969 मध्ये हा चित्रपट पडद्यावर झळकला होता. त्यांनी या चित्रपटात काही गीतेही गायली. एक प्रकारे त्यांचा सफर सुरू झाला होता. मात्र, ज्या अपेक्षेने ते मायानगरीत आले होते, त्या अपेक्षा काही पूर्ण झाल्या नाहीत. मायानगरीत पाऊल ठेवल्यानंतर बॉलिवूडमध्ये टिकणे महत्त्वाचे असते. त्या वेळी बॉलिवूड हा शब्दही प्रचलित नव्हता. चित्रपटसृष्टीच म्हंटले जायचे. जगजितसिंग यांना 1970 मध्ये आणखी एका गुजराती चित्रपटात संधी मिळाली. ‘धरती ना छोरों’ हा तो चित्रपट. त्यात सुमन कल्याणपूर व जगजितसिंग यांनी एक युगलगीत गायले आहे. त्यानंतर जगजितसिंग यांनी मागे वळून पाहिलेच नाही. संघर्षकाळात ज्यांच्यासोबत ते दुःख शेअर करायचे त्या सुभाष घई यांनी पुढे उत्तम दिग्दर्शकच नव्हे, तर उत्तम निर्माता व पटकथालेखक म्हणूनही लौकिक मिळवला. दुसरीकडे जगजितसिंग यांच्या अल्बमनाही भारतीय संगीतप्रेमींनी डोक्यावर घेतले होते. सुभाष घईंच्या दोन चित्रपटांत त्यांनी गझल गायल्या आहेत. ते दोन चित्रपट म्हणजे ‘खलनायक’ आणि ‘जॉगर्स पार्क’. ‘खलनायक’मध्ये ‘ओ माँ तुझे सलाम, तेरे बच्चे प्यारे, रावण हो या राम’ आणि ‘जॉगर्स पार्क’मध्ये ‘बडी नाजूक है ये मंजील, मोहब्बत का सफर है…’
2001 मधील ‘तुम बिन’ या चित्रपटातली एक गझल खूपच लोकप्रिय झाली होती. अर्थातच साडेसात मिनिटांच्या या गझलेला जगजितसिंग यांच्या गायकीचा ‘मिडास टच’ होता.
जागते जागते एक उम्र कटी हो जैसे
जान बाकी है मगर सांस रुकी हो जैसे
2016 मध्ये ‘तुम बिन’चा दुसरा पार्ट प्रदर्शित झाला. त्यातही जगजितसिंग यांचीच गझल होती. ‘ओ नजर छुपती मुझे देख रही हो जैसे…’ या गझलेने अनेकांच्या मनात घर केलेलं होतं. त्यामुळेच निर्माते भूषण कुमार यांनी दुसऱ्या भागातील ‘तुम बिन’मध्ये या गझलेची जादू पुन्हा आणली. अनेक चित्रपटांमधील जगजितसिंग | Jagjit Singh | यांच्या गायकीने अनेकांना मोहित केले होते. त्यातली गीते आजही मनात रुंजी घालतात…
नींद के गाँव में आज यादों का बाज़ार है
खिलखिलाते हुए अपना दामन उठाते हुए
बच्चों के पाँव की धूल का कारवाँ
गाँव की हर गली अपने पैरों की ज़ंजीर है
गाँव का हर मकान अपने रस्ते की दीवार है
नींद के गाँव में आज यादों का बाज़ार है
अशी काही गीते ऐकली, की ही जादू खरोखर जाणवते. अर्थात, नाही म्हंटलं, तरी चित्रपटांतली गाणी गाण्याचा त्यांना एक प्रकारे उबगच आला होता. त्यांनी त्यामागचं कारणही स्पष्ट केलं होतं. ते म्हणाले होते, की चित्रपटांतल्या गाण्यासाठी अनेकांचं तुष्टीकरण करावं लागतं. आधी ते दिग्दर्शकाला समाधानी करावं लागतं, नंतर कथानकाला, नंतर ते ज्यांच्यावर रचलं आहे त्या नायक-नायिकांना समाधानी करावं लागतं. जिथे हे गाणे शूट होणार आहे त्या लोकेशनलाही ते सूट झालं पाहिजे. या सगळ्या दिव्यातून मग ते गाणं फायनल होतं. त्यामुळे जगजितसिंग यांना मनासारखं काही करताच येत नव्हतं. नंतर त्यांनी चित्रपटांत गायन करणेच सोडून दिल्याचे सांगितले जाते. मात्र, जगजितसिंग यांनीच यावर खुुलासा करताना सांगितले, की मी चित्रपटांत गायन करणे सोडले नाही, तर मलाच चित्रपटसृष्टीने सोडले. कारण ज्या प्रकारचं संगीत त्यांना हवं होतं, ते माझ्याकडून त्यांना मिळत नव्हतं. त्यांनी सुरुवातीला ‘अर्थ’, ‘प्रेमगीत’, ‘साथ साथ’ आदी काही चित्रपटांत गीतगायन केले होते. अर्थात, या सुरुवातीच्या काळात त्यांनी काही चुकीचे चित्रपटही निवडले. त्यांना कळलं, की अरे आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत. असं धावणं व्यर्थ आहे, म्हणून त्यांनी तो मार्गच सोडून दिला. त्यांच्या मते, यात कसलं आलंय स्वातंत्र्य? त्यापेक्षा स्वतःच गीते निवडून स्वतःलाच समाधानी करणं केव्हाही चांगलं. नंतर ते स्वतःच्या मार्गाने गेले. त्याचे रिझल्ट तुुम्ही पाहतच आहात.
jagjit singh life story | देशभरातील कलाकार मायानगरीत येतात, त्याचं मूळ कारण बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळावा, हेच आहे. जगजितसिंग यांनीही आधी हेच केलं होतं, पण लवकरच त्यांना त्यातून बाहेर पडावंसं वाटलं. मात्र, अनेकांनी या बॉलिवूडमध्ये पाय रोवण्यासाठी तोच मार्ग निवडला, जो जगजितसिंग यांनी केव्हाच नाकारला होता. जगजितसिंग बॉलिवूडमधून बाहेर पडले, पण बॉलिवूडने त्यातून काही बोध घेतला नाही. केवळ बाजाराचे निकष पूर्ण करताना बॉलिवूडने जगजितसिंग यांच्यासारखा जादूई आवाजाचा गायक गमावला होता. जेव्हा जगजितसिंग स्वतःच्या समाधानासाठी गायचे तेव्हा त्यांच्या गायकीचे अनेक रंग बाहेर पडायचे.
‘यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत…’ हा भगवद् गीतेतला श्लोक असो वा ‘त्वमेव माता च पिता त्वमेव । त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणम् त्वमेव । त्वमेव सर्वम् मम देव देव’ हा संस्कृत श्लोक असो.. हे ऐकल्यानंतर वाटत नाही, की हा आवाज विरह वेदनेच्या गझलाही गात असेल! पण हीच तर त्यांच्या आवाजाची खासियत होती, ज्यात सगळे जीवनरस सामावलेले होते. त्यांनी गायलेल्या ‘हरे कृष्णा हरे कृष्णा। कृष्णा कृष्णा हरे हरे’ या भजनांमध्ये लोकांना तल्लीन व्हावेसे वाटते. अर्थात, ही भक्तिगीते त्यांची पूजा मुळी नव्हतीच, तर गायकी हीच त्यांची सर्वांत मोठी पूजा होती. त्यात सगळ्याच धर्मांना समान जागा होती. ते म्हणतातही, ”धर्म ही एक जीवनशैली आहे. ते आपल्याला शिकवतात, की जगायचे कसे? बाकी मंदिरात जाणं, टिळा लावणं, घंटानाद करणं इत्यादी पूजाविधी आहेत. ते महत्त्वाचे अजिबात नाहीत. महत्त्वाचे हेच आहे, की तुम्ही ज्या धर्माचे पालन करताहात, त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जीवन जगत आहात किंवा नाही. जर तसं जगत नसाल तर काही उपयोग नाही. मी तर सर्वच धर्म मानतो.”
जगजितसिंग नव्या पिढीतल्या उदयोन्मुक कलावंतांना गझल गायकीचे धडेही द्यायचे. अनेक कार्यक्रमांत ते शास्त्रीय संगीत म्हणजे काय, याची माहितीही द्यायचे. शास्त्रीय संगीताचे जाणकार असणे वेगळे आणि सामान्यांना त्याची माहिती सोप्या भाषेत देण्याची कला वेगळी. जगजितसिंग यांच्याकडे ती होती. म्हणूनच ते सामान्य माणसांनाही त्यांच्या भाषेत संगीतकलेची माहिती पोहोचवू शकले. त्यांचं जग’जित’ हे नाव त्या अर्थानेही शब्दशः सार्थ ठरलं.
1995 मध्ये ‘क्राय फॉर क्राय’ | Cry For Cry | हा अल्बममध्ये त्यांनी गायकीचा उत्तम नमुना पेश केला. यात त्यांनी गरीब आणि शेतकऱ्याच्या वेदना आपल्या गायकीतून खूपच सुंदर पद्धतीने पेश केल्या आहेत…
अब मैं राशन की क़तारों में नज़र आता हूँ
अपने खेतों से बिछड़ने की सज़ा पाता हूँ
ही नज्म ऐकल्यानंतर जाणवतं, की खरंच जगजित यांची गझल केवळ प्रेमाच्या मैफली सजविणारी नाही, तर सामान्यांच्या हृदयाचा ठाव घेणारीही आहे.
मैं ना हिंदू ना मुसलमा मुझे जिने दो
दोस्ती है मेरा इमान मुझे जिने दो
कोई ऐहसाँ ना करो मुझ पे तो एहसाँ होगा
सीर्फ इतना करो एहसाँ मुझे जिने दो
हे गीत तर इतकं अप्रतिम आहे, की कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही. जगजितसिंग यांच्या गळ्याला सोशल टचही आहे याची प्रचीती येते. जीवनाचे सगळे रस असे ठासून भरलेले होते.
तेरा चेहरा कितना सुहाना लगता है
तेरे आगे चाँद पुराना लगता है
शांतपणे गझला ऐकणारं मन या गझलेवर मात्र प्रफुल्लित होतं. विदेशातील एका कॉन्सर्टमध्ये अनेक जण प्रत्येक नज्मला उत्स्फूर्त दाद देत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. ही त्यांच्या आवाजाची जादू. ही गझल पेश करताना ते पती-पत्नीवर आधारित अनेक विनोदही सांगायचे. त्यामुळे मैफलीत हास्याचे कारंजे उडायचे. एक विनोद इथे सांगावासा वाटतो…
एकदा पत्नी माहेरी जाते. पती घरी एकटा असतो. तो पत्नीचे छायाचित्र भिंतीवर टांगतो आणि त्यावर चाकू फेकून निशाणा साधण्याचा प्रयत्न करतो. पण एकही निशाणा लागत नाही. तेवढ्यात पत्नीचा फोन येतो- ”डार्लिंग क्या कर रहे हो..?”
पती ः तुम को मिस कर रहा हुं..
जगजितसिंग गझलगायन करतात म्हणजे ते गंभीर असतात असं नाही. भलेही त्यांचा चेहरा गंभीर वाटत असेल, पण ते तसे नाहीत हे या उदाहरणावरून जाणवतं. अनेक गीते त्यांनी अशी सादर केली आहेत, की त्या गाण्यावर सगळेच थिरकतात. अगदी जगजितसिंगही थिरकताना अनेकांनी पाहिले आहेत. असं असलं तरी एक गीत असंही आहे, की त्या गाण्यावर अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू घळाघळा वाहतात. हे पंजाबी लोकगीत आहे, ज्यात एका पत्नीला विदेशात गेलेल्या पतीची आठवण येते. तिला मूल नसते, त्यामुळे तिला कमालीचा एकटेपणा जाणवत राहतो. त्यामुळे ती एक मातीचा पुतळा बनवते आणि त्याच्यात आपलं मन रमवते…
मिट्टी दा मैं बावा बनाणीआं
उत्ते चा दिन्नी आं खेसी
वतनां वाले माण करन
की मैं माण करां परदेसी
मेरा सोहणा माही, आजा वे
हे मन व्याकुळ करणारं लोकगीत आणि त्यात जगजितसिंग यांचा आवाज… जगजितसिंग यांनी वीसपेक्षा अधिक भाषा, तसेच बोली भाषेतील गीते गायली आहेत. 1995 मध्ये कुरुक्षेत्र विद्यापीठाने त्यांना डी.लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले, तर 1998 मध्ये लता मंगेशकर पुरस्कार, 1999 मध्ये दयावती मोदी पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘बियाँड टाइम’ | Beyond Time | ही जगजितसिंग यांची आत्मकथा | Life Journey | आहे.
जिस्म की बात नहीं थी उन के दिल तक जाना था
लम्बी दूरी तय करने में वक़्त तो लगता है
गाँठ अगर लग जाए तो फिर रिश्ते हों या डोरी
लाख करें कोशिश खुलने में वक़्त तो लगता है
जगजितसिंग यांना सुरांचं इतकं ज्ञान होतं, की त्यांच्या साथीदारांच्या वाद्यातला थोडासाही सूर हलला तर ते लगेच ओळखायचे. गिटार, सतारवादनात त्यांना तसं काही जाणवलं, की ते लगेच त्या वादकाला म्हणायचे, जी नोट ठीक कर, एफ नोट ठीक कर. हे सगळं ते स्टेजवरच सांगायचे. पण मनाने खूपच निर्मळ. आपल्या साथीदारांची ते तेवढीच काळजीही घ्यायचे.
कुदरत ने इसको अपने हाथों से है संवारा
वीरों ने इसको अपने है खून से निखारा
सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा
जगजितसिंग यांच्या आवाजातील हे देशभक्तिगीत अनेकांनी ऐकले असेल. हे गीत ऐकणारी पिढी आता धूसर होत चालली आहे. केवळ दर्दी संगीतप्रेमींनाच ते आता ठाऊक असेल.
जगजितसिंग अश्वप्रेमीही होते
गझलगायकीत रमणारे जगजितसिंग यांना घोड्यांवर विशेष प्रेम होतं, हे खूपच कमी लोकांना माहीत असेल. हा शौकही त्यांना मुंबईतच लागला. सुरुवातीला ते आग्रीपाडात राहायचे तेव्हा काही पंटर घोडे आणायचे. हळूहळू पंटिंग सुरू केली. म्हणजे घोडेस्वारी सुरू केली. जेव्हा त्यांच्याकडे पैसे आले तेव्हा त्यांनी घोडेही खरेदी केले. मग रेसिंगमध्येही भाग घ्यायला सुरुवात केली. यातूनच त्यांना घोड्यांची माहिती मिळाली. त्यांना अनेक घोड्यांची विशेष पारख होती. कोणता घोडा कोणत्या रेसमध्ये जिंकेल किंवा कोणत्या घोड्याला पळवायला हवं, याचीही समज त्यांना होती. त्यांच्याकडे 10-15 उमदे घोडे होते.
एक शेर आहे…
नज़र नज़र में उतरना कमाल होता है
नफ़स नफ़स में बिखरना कमाल होता है
बुलंदियों पे पहुँचना कोई कमाल नहीं
बुलंदियों पे ठहरना कमाल होता है
जगजितसिंग यांना हा शेर तंतोतंत लागू पडतो. ते शिखरावर पोहोचलेच नाही, तर ते तेथे टिकून राहिले. ती जागा कोणीही घेऊ शकलं नाही.
![]() |
Jagjit Singh Ghazals |
अखेरचे दिवस…
जगजितसिंग 24 जानेवारी 1998 रोजी लुधियानात आपले मित्र अशोक भल्ला यांच्या मुलाच्या लग्नाला आले होते. लग्नसोहळ्यात त्यांचे चाहते कमी नव्हते. त्यांना भेटण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती. त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी चढाओढ लागली होती. ते हसत हसत त्यांना ऑटोग्राफ देत होते. मात्र, अचानक त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यावर गांभीर्याच्या छटा उमटल्या. ते सारखे एक हात आपल्या छातीवर ठेवत होते. अखेरीस तेथेच ते मटकन बसले. अशोक भल्ला यांनी तातडीने त्यांना लुधियानातल्या क्रिश्चियन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. रक्तदाब खूपच वाढला होता. चित्रा तातडीने मुंबईहून लुधियानाला रवाना झाल्या. जगजित यांना शुद्धीवर आलेले पाहिल्यानंतर त्यांचा जीव भांड्यात पडला. जगजितसिंग दोन दिवस आयसीयूमध्ये होते. हृदयविकाराचा तो हलकासा धक्का होता. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण देश त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत होता. दोन दिवसांनंतर त्यांना दिल्लीतील एस्कॉर्ट्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचा 8 फेब्रुवारीला वाढदिवस होता. डॉक्टरांनी त्यांना काही दिवसांची मुभा दिली. वाढदिवसाची पार्टी सेलिब्रेट केल्यानंतर त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यथावकाश हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली, पण डॉक्टरांनी त्यांना काही अटींवर ही सुटी दिली. त्या म्हणजे यापुढे मद्यपान, सिगारेट संपूर्णपणे बंद करायचे. विमानप्रवास टाळायचा आणि पूर्णपणे विश्रांती घ्यायची. जगजितसिंग यांनी या अटी मान्य करीत मुंबईला जाण्याऐवजी डेहराडूनला विश्रांतीसाठी गेले. तेथे त्यांचे घनिष्ठ मित्र वैद्य बालंदू प्रकाश राहतात.
त्यांनी बालेंदूंना कळवले, की ‘वैद्यराज, मी येतोय. तू करणार ना माझी खातीरदारी?’
बालेंदू म्हणाले, ”हो, का नाही..”
त्यांच्या सेवेची जबाबदारी वैद्य बालेंदू यांनी स्वीकारली. जगजितसिंग यांनी तेथे तीन आठवडे विश्रांती घेतली. जगजितसिंग ठणठणीत होऊनच मुंबईला परतले. दिवसामागून दिवस सरले. जगजितसिंग विसरले, की कधी हृदयविकाराचा झटकाही आला होता. त्यांचे देश-विदेश दौरे पुन्हा सुरू झाले. संगीत मैफली पुन्हा झड़ू लागल्या. पण सगळे काही नॉर्मल नव्हते. नियतीचा राग अजून शांत झालेला नव्हता.
विवेकच्या मृत्यूनंतर मुलगी मोनिका चित्रा यांचा आधार झाली होती. पण मोनिकाचं आयुष्यही म्हणावं तितकं सुखी नव्हतं. तिच्या आयुष्यातही अनेक वेदनांचे काटे होते. ती आपल्या वेदना विसरून आईवडिलांच्या वृद्धत्वाची काठी बनली. मात्र, तिचा सहवासही या वृद्ध दाम्पत्याच्या नशिबी नव्हता. एके दिवशी 2009 मध्ये सकाळी मोनिकाच्या मृत्यूने जगजितसिंग आणि चित्रा यांचं आयुष्य पुन्हा अंधकारात ढकललं गेलं. मोनिकाने आत्महत्या केली होती. हा धक्का वृद्ध जगजितसिंग आणि चित्रा यांचं काळीज चिरणारा होता. विवेकनंतरचा एकमेव आधार म्हणून जिच्याकडे पाहिलं, तीच निराधार करून गेली. काही वेळानंतर जगजितसिंग यांना रक्ताच्या गुठळ्यांच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले. कमला हिल रिसर्च हार्ट सेंटरमध्ये उपचार सुरू झाले. रक्त पातळ करण्याची औषधे सुरू झाली. कालांतराने 2010 वर्ष समीप आले. जगजितसिंग 70 व्या वाढदिवसानिमित्त संगीतप्रेमींना खास भेट देणार होते. पुन्हा नव्या कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यांनी ठरवलं, की 70 व्या वाढदिवसानिमित्त संगीतप्रेमींसाठी वर्षभरात 70 कार्यक्रम सादर करायचे. जगजितसिंग यांचं मन तरुण होतं. पण वय साथ देत नव्हतं. वर्षभरात 70 कार्यक्रम म्हणजे महिन्याला किमान सहा कार्यक्रम. पण नियतीला हे मान्य नव्हतं.
![]() |
Jagjit singh and Chitra with son Vivek |
20 सप्टेंबर 2011 रोजी जगजितसिंग यांचा एक सुपरहिट कार्यक्रम डेहराडूनला झाला. पण हा आयुष्यातला अखेरचा कार्यक्रम असेल याची कोणालाही कल्पना नव्हती. मात्र, या कार्यक्रमाने संगीतप्रेमींच्या डोळे पाणावले. कारण जगजितसिंग | Jagjit Singh | यांना विवेकची प्रचंड आठवण आली. यामागचे कारण म्हणजे विवेकनंतर मोनिकाचे जाणे… त्यातच हृदयविकाराने ते कमालीचे भावनिक झाले होते. आज विवेक असता तर किती आधार असता, हा विचार त्यांच्या मनात शिवला नसेल तरच नवल… कारण या वेळी गझलही तशीच होती..
चिठ्ठी ना कोई संदेस
जाने वो कौन सा देश
जहाँ तुम चले गए
तुम्हें ढुंढ रहा है प्यार
हम कैसे करें इकरार
के हाँ तुम चले गए
त्याच्या पुढच्याच दिवशी 21 सप्टेंबर 2011 रोजी जगजितसिंग | Jagjit Singh | मुंबईत आले. 23 सप्टेंबर रोजी पाकिस्तानचे प्रसिद्ध गझलगायक गुलाम अली यांच्यासोबत मुंबईत त्यांचा कार्यक्रम होता. 22 सप्टेंबर रोजी रात्री त्यांनी थोडा रियाझ केला आणि झोपायला गेले. काही वेळच झाला नाही, तर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. चित्रा यांना वाटले, पोट दुखत असेल. म्हणून त्यांनी एक टॅब्लेट दिली. जगजित यांनी टॅब्लेट घेऊन बिछान्यावर अंग टाकलं. पण आराम मिळाला नाही. या वेळी कोणताही आवाज न आल्याने चित्रा त्यांना पाहायला गेल्या. बघतात तर काय, जगजितसिंग यांची हालचाल काहीशी मंदावलेली होती. चित्रा त्यांच्या जवळ आल्या, तर जगजितसिंग त्यांना म्हणाले, माझं डोकं फाटतंय जणू. घाबरलेल्या चित्राने तातडीने नातू अरमान (मोनिकाचा मुलगा) आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने मध्यरात्री लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बराच वेळ तर डॉक्टरच नव्हते. डॉक्टर आले तेव्हा त्यांना ब्रेन हॅमरेज झाला. उपचार सुरू झाले, पण जगजितसिंग कोमात गेले. दिवसांमागून दिवस चालले, 18 दिवस झाले, पण जगजितसिंग कोमातून बाहेर आलेच नाहीत. इथे चित्रा यांची अवस्था काय झाली असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. कारण मुलगा विवेक, नंतर मुलगी मोनिका यांच्यानंतर त्यांना जगजितसिंग यांचाच तर आधार होता. पण डॉक्टर दिलासा देत होते. याच हॉस्पिटलमधील एक महिला तीन वर्षांनंतर कोमातून बाहेर आल्याचे त्यांना सांगण्यात आले. नंतर एक बातमी वाचण्यात आली, की कोणी मरिनड्राइव्हवरील माणूस 11 वर्षांनी कोमातून बाहेर आला. त्यामुळे त्यांना एक विश्वास वाटू लागला, की असंच आपल्याही बाबतीत घडेल. पण आशेचा फुगा फुटला आणि जगजितसिंग यांनी अखेर या जगाचा निरोप घेतला.
गझलविश्व समृद्ध करणाऱ्या एका गायकाचा प्रवास संपला होता. मात्र त्यांच्या गायकीचा नंदादीप अजूनही तेवत आहे, त्यांच्या आठवणींतून, गीतांतून…
समाप्त
जगजितसिंग यांच्या आठवणी त्यांच्या गझल गायनाइतकीच दर्दभरी…..! आवडले.
Jyotsna ji,
Thank you so much